आंदोलन कोणीही करा पण या अनधिकृत फेरीवाल्याना हाकला.
काल मनसे नी केलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधातल्या आंदोलनानंतर अनेकांना फेरीवाल्यांचा पुळका आल्याचं दिसलं. वास्तविक या मंडळींनाही अनेकवेळा या फेरीवाल्यांचा त्रास होतच असेल पण तिथे बोलण्याची आणि आवाज उठवण्याची यांची हिम्मत नसते. अगदी स्वतःच्या बिल्डिंगच्या गेटवर बसलेल्या फेरीवाल्याला पण 'भाई थोडा सामान बाजूने लेना हं, आने जाने को तक्लिप होता है' असलं काहीतरी मुळमुळीत बोलल्याचं पण पाहायला मिळतं. ज्यांना या आंदोलनाचा राग आला असेल किंवा आंदोलन करणाऱ्या मनसेवर टीका करण्याची संधी साधण्याची हीच योग्य वेळ आहे अस वाटत असेल त्यांनी माझ्या काही मुद्य्यांकडे लक्ष द्यावं.
तूम्हाला फेरीवाल्यांचा इतका कळवळा असेल तर एकदा स्टेशनजवळ किंवा एखाद्या बाजारपेठेत स्वतःच्या पैशाने एक दुकान विकत घेऊन बघा.. नसेल जमत तर भाड्याने घेऊन बघा. पूर्णपणे अधिकृत बांधकाम केलेले दुकान, त्यावर दरवर्षी भरावयाचा कर, सर्व नियमांचे पालन आणि गुमास्ता फी भरल्यानंतर तुमच्या दुकानाबाहेर जेव्हा एखादा फालतू फेरीवाला माल विकून तुमच्याशी स्पर्धा करेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
स्टेशन जवळ जायच्या यायच्या रस्त्यात तुम्हाला फूटपाथ शोधावा लागतो आणि मग बेफाट रिक्षांच्या गर्दीला छेदत रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला एखाद्या वाहनाचा जोरदार धक्का लागेल आणि तुमचे आठ दिवस अंथरुणावर कळवळण्यात जातील तेव्हा तुम्हाला हा फेरीवाला नकोसा वाटेल.
स्टेशनच्या पादचारी पुलावरून गाडी पकडायला धावताना जेव्हा एखाद्या फेरीवाल्याच्या मांडलेल्या सामानावर तुमचा पाय पडल्यानंतर तुमच्या आयाबहिणिंचा जो उद्धार तो करेल आणि तुमचा जाहीर अपमान होईल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
कधी तुम्ही तुमच्या लाडक्या कटुंबाबरोबर तुमच्या एसी कारमधून खरेदीला जाल आणि थोड्या वेळासाठी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क कराल तेव्हा समोरच्या फुटपाथवर अनधीकृतपणे 'सब्जी' विकणारा तुम्हाला अतिशय उद्धटपणे गाडी पुढे घ्यायला सांगेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांबरोबर जे बिनकामाचे भिकारxx लोक गप्पा मारत बसलेले असतात त्यात काही त्यांचेआश्रयदाते, भाई, दादा पण असतात. हे लोक जेव्हा तुमच्या घरातल्या स्त्री ची छेडखानी किंवा अपमान करतील आणि तुम्ही हतबल असाल तेव्हा तुम्हाला ते नकोसे वाटतील.
संध्याकाळी देवळात जाणाऱ्या तुमच्या म्हाताऱ्या आईबापाला या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे जेव्हा रस्त्यात नीट चालता येणार नाही आणि एखाद्या अडचणीच्या ठिकाणी पडून त्यांचे एखादे हाड मोडेल कदाचित तेव्हा तुम्हाला हे फेरीवाले नकोसे होतील.
स्वच्छतेची काळजी न घेता, हायजिनचे कोणतेही नियम न पाळता विकायला ठेवलेल्या चायनीज भेळ, पाणीपुरी, रंगीत सरबत असल्या टुकार गोष्टी खाऊन तुमच्या लहान मुलांना एखादा आजार होईल तेव्हा तुम्हाला हा रस्त्यावरचा फेरीवाला नकोस होईल.
तुमचे शहर, तुमचे रस्ते, तुमचे फूटपाथ यावर कब्जा करण्यासाठी प्रामाणिक पोलिसांना पण अप्रामाणिक बनण्याची लालूच देणारे आणि गुंडगिरीचा आधार घेणारे हे फेरीवाले कसे सहन होतात तुम्हाला. बरं ' मग त्यांना हटवणाऱ्या राज ठाकरेंनी त्यांना नोकऱ्या द्याव्यात' असलेही मूर्ख मेसेज वाचण्यात आले. मला तर हा मूर्खपणा कळतच नाही. अरे ज्या फेरीवाल्यांनी काही महिन्यांपूर्वीच ड्युटीवर असलेले ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती त्या फेरीवाल्यांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. खरं तर यांना लाथ मारून हाकलायचं काम पोलिसांचं आणि प्रशासनाचं. पण तिथूनही काही कारवाई नाही. मग एखाद्याने हे काम केलं तर चुकलं कुठे. आपल्या समक्ष चाललेल्या या गोष्टींकडे डोळेझाक करत स्वतः आंधळ्यासारख जगायचं आणि तुमचा रस्ता मोकळा करणाऱ्याला मात्र गुन्हेगारासारखं पाहायचं हे बरोबर नाही.
ज्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरात कचरापट्टी वाढते, रोगराई वाढते, अपघात होतात, गुंडगिरी वाढते, भ्रष्टाचार बोकाळतो त्यांना रोखलेलं कधीही चांगलं. इथे मराठी अमराठी हा तर मुद्दाच नाही - अधिकृत आणि अनधिकृत हाच मोठा मुद्दा आहे. लक्षात घ्या, महानगरपालिकेचा योग्य कर भरून, लोकवस्त्यांमध्ये फिरत गाडीवर भाजीपाला विकणाऱ्या किंवा इतर फेरीवाल्यांबद्दल बोलत नाहीये मी.. शहरातले फूटपाथ ढापणाऱ्या आणि शहराचे सौन्दर्य नष्ट करणार्यांबद्दल माझा आक्षेप आहे.
आणि इतका त्रास असतानाही ज्यांना या अनधिकृत फेरीवाल्यांसाठी इतकी सहानुभूती असेल त्यांनी द्यावीत की त्यांना अधिकृत दुकाने घेऊन - एखाद्याला सन्मानपूर्वक जगण्याची दिशा दिल्याचं समाधान तरी तुम्हाला मिळेल.
No comments:
Post a Comment